दहशतवादी हल्याचा सामना करणाऱ्या ‘टाॅप टेन’ देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यातच देशातील अस्थिर सामाजिक वातावरणाचा फायदा घेण्यासाठी प्रमुख जागतिक दहशतवादी संघटना एकवटल्याची बाब पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेऊन आलेल्या ३२ वर्षीय आरोपींच्या चौकशीतून पुढे आली आहे.
आयएस, अंडरवर्ल्ड आणि इंडियन मुजाहिद्दिन या संघटनांनी एकत्र येऊन भारतावर हल्ला करण्याचं षडयंत्र रचल्याची माहिती आरोपीच्या चौकशीतून पुढं आली आहे. एवढंच नव्हे, तर भारतात धार्मिक दंगली घडवण्यासाठी दहशतवाद्यांनी देशातील हिंदूत्ववादी संघटनांच्या प्रमुख नेत्यांनाही लक्ष्य करण्याचं ठरवलं आहे.
दहशतवाद रोखण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा असलेला अभाव, बुद्धीजीवींवर होणारे हल्ले आणि शेजारच्या शत्रू राष्ट्राकडून मिळणारी मदत या तीन गोष्टींचा अभ्यास करत दहशतवादी संघटना आपले डोके वर काढू पहात आहे. तरीही दहशतवाद्यांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवत, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांना आतापर्यंत थोपवलं आहे.
मात्र 'जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही', या म्हणीनुसार वेगवेगळ्या मार्गाने दहशतवादी संघटना भारतावर हल्ला करण्याचा पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करत राहतात. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेऊन आलेल्या फैजल मिर्झा या दहशतवाद्याने महाराष्ट्र एटीएससमोर अनेक खुलासे केले आहेत.
जोगेश्वरीच्या बेहरामबाग परिसरात राहणारा फैजल अंडरवर्ल्डसाठी काम करणारा चुलता फारूख देवाडीवाला याच्या संपर्कात होता. त्याच्या संपर्कातूनच त्याने दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी ५ महिन्यांपूर्वी देश सोडला. आपण नोकरीसाठी परदेशी जात असल्याचा बनाव त्याने केला. पोलिस किंवा सुरक्षा यंत्रणांना संशय येऊ नये, म्हणून तो शारजामार्गे कराचीला गेला.
त्यानंतर पुढे २ आठवडे फैजलने दशतवादी संघटनांकडून प्रशिक्षण घेतलं. त्या ठिकाणी १ मौलवी, २ ट्रेनर, २ सुविधा पुरवणारे हस्तक, १ हँडलर यांनी त्याला प्रशिक्षण दिलं. पाकिस्तानात फैजलला इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख आमिर रझा खान यानेच ट्रेनिंग दिलं. याच आमिरने या आधी यासीन भटकळला दहशतवादी हल्ले करण्यासाठी प्रशिक्षण दिलं होतं. त्यानंतर फैजल गेलेल्या मार्गानेच काही दिवसांपूर्वी भारतात परतला.
दहशतवाद्यांनी म्होरक्यांना पाकिस्तानात आणण्याची ही नवीन पद्धत असल्याचं फैजलच्या चौकशीतून पुढं आलं आहे. दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या फैजलची माहिती कोलकाता एटीएसने महाराष्ट्र एटीएसला दिली. त्यानंतर पोलिसांनी भारतात परतलेल्या फैजलचा शोध घेत त्याला अटक केली.
भारतात आल्यानंतर फैजलने अतिमहत्त्वाच्या स्थानकांची रेकी करण्यास सुरूवात केली. त्यात मुंबई, गुजरात आणि उत्तरप्रदेश या राज्यांच्या समावेश होता. त्याच बरोबर देशातील अतिमहत्वाच्या हिंदूत्ववादी संघटनांच्या नेत्यांनाही लक्ष्य करण्यास त्याला सांगण्यात आलं होते. कोलकाता एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवादी संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणार होते.
त्यानुसार पाकिस्तानमधून मिळणाऱ्या सूचनांची तो वाट बघत होता. मात्र त्या पूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केल्याने मोठा अनर्थ टळला. फैजलच्या अटकेनंतर मुंबईतून त्याला परदेशात पाठवणाऱ्या २ सहकाऱ्यांचा पोलिस आता शोध घेत आहेत. फैजलजचे पुढील मनसुबे काय आहेत. त्याचे देशातील इतर साथीदार कोण आहेत? इ. माहिती घेण्याचं काम सध्या पोलिस करत आहेत.
पोलिसांना त्यांच्या मोबाइलमध्ये काही संशयास्पद नंबर आणि माहिती मिळून आली आहे. याप्रकरणी दहशतवादविरोधी पथक अधिक तपास करत आहेत. न्यायालयाने त्याला २१ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तसंच काही महिन्यांपूर्वी दिल्लीतून अटक केलेल्या इंडियन मुजाहिद्दीनचे म्होरकेही फारूख देवाडीवालाच्या संपर्कातूनच पाकिस्तानला ट्रेनिंग घेऊऩ आल्याचं पुढं आलं आहे. त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.
हेही वाचा-
एटीएसने ISISच्या वाटेवरील ११८ जणांना रोखलं, २० जण मुंबईतले
पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आलेल्या एकाला अटक