लोकलमधील गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशांना लुटणाऱ्या एका सराईत महिला चोराला जीआरपीने अटक केली आहे. अश्विनी महेश माळवदे (३०) असं या महिलेचं नाव आहे. या महिलेवर मुंबईतच नव्हे, तर नाशिक, हैदराबाद इथंही असंख गुन्ह्यांची नोंद आहे.
विशेष म्हणजे अश्विनी केवळ चोऱ्या करण्यासाठी मुंबईत येत असे आणि त्यानंतर पुन्हा आपल्या मूळगावी परतत असे. आतापर्यंत अश्विनीने ठाणे 'एसटीएफ'कडे ६ गुन्ह्यांची कबुली दिली असून १ लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.
चेहऱ्याने साधीभोळी दिसणारी अश्विनी गर्दीचा फायदा घेऊन लोकलमध्ये चढायची आणि महिलांचे मंगळसूत्र तसेच सोन्याची चेन चोरून गर्दीत गायब व्हायची. बॅगेतील मोबाइल आणि पर्स देखील लीलया चोरण्यात तिचा हातखंडा होता.
वयाच्या २० व्या वर्षांपासून चोरी करणाऱ्या अश्विनीला याआधी बऱ्याचदा अटक देखील झाली आहे. पोलिसांना अश्विनीचं पूर्ण नाव आणि पत्ता माहीत असल्याने ती पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी सतत आपलं नाव बदलायची. तिचं सध्याचं नाव रानी क्रान्ती भोसले असं होतं. तर त्यापूर्वी तिने नीता नितीन इंगळे हे नाव धारण केलं होतं.
मागच्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेमध्ये चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली होती. चोऱ्या विशेष करून गर्दीच्या वेळेत होत असल्याचं जीआरपीच्या एसटीएफच्या लक्षात आलं. त्यातच कुर्ला स्थानकात ४, दादरमध्ये १ आणि सीएसटीएमच्या हद्दीत १ चोरी झाली होती.
जीआरपीच्या एसटीएफने स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासली असता त्यात अश्विनीसारखी दिसणारी एक महिला स्थानकात संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. त्यानंतर ठाणे जीआरपीची एक टीम तात्काळ औरंगाबादला रवाना झाली आणि अश्विनीला पकडण्यात आलं. या सगळ्या चोऱ्या अश्विनीने केल्याचं मान्य केलं असून तिच्याकडून १ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल फोन जप्त केल्याची माहिती जीआरपीने दिली.
हेही वाचा-
घरात पाणी सांडलं म्हणून सासऱ्याने सुनेच्या डोक्यात घातला हातोडा
'ते' मालाडमध्ये बसून अमेरिकन नागरिकांना लुबाडायचे!