मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे २ धमकीची निनावी पत्रे मंत्रालयात आली असून या पत्रातून मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रांची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्य पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी पोलिसांना सर्तकतेचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री अाणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत पोलिसांकडून वाढ करण्यात आली अाहे.
काही दिवसांपूर्वी गडचिरोलीत पोलिसांनी अनेक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. या राज्य सरकारच्या आणि पोलिसांच्या कारवाईसंदर्भातच हे पत्र असून नक्षलवाद्यांना मारल्याचा बदला घेऊ, असा उल्लेख पत्रात असल्याचं समजतं. केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांना आणि नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनाही धडा शिकवू, असं या पत्रात नमूद केलं अाहे.
आम्हाला ठार करून तुम्ही आमचा विचार संपवू शकत नाही. मार्क्सच्या विचारांनी आम्ही आमची चळवळ सुरूच ठेवली असल्याचं या पत्रात नमूद केलं अाहे. या पत्राची गंभीर दखल घेत याची चौकशी सीआयडीकडं सोपवण्यात आली आहे. ही पत्रं कुठून आली, कधी पोस्ट झाली, कुणाकडून आली याचा शोध सीआयडी घेत आहे. दरम्यान, भीमा-कोरेगाव प्रकरणात बुधवारी ५ जणांना अटक झाली आहे. त्याच्याशीही या पत्रांचा संबंध अाहे का याचा तपास केला जात अाहे.
पोलिसांनी देशभरात छापे मारून काहींना अटक केली अाहे. त्यामध्ये अनेक पुरावे मिळाले आहेत. काही संभाषणही हाती लागलं अाहे. यामध्ये राजीव गांधी यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांना मारलं पाहिजे अशी सूचना एक नक्षली नेता दुसऱ्याला देत आहे. हे अत्यंत गंभीर आहे. पोलीस तपास सुरू आहे. नक्षलवाद्यांचा एक भाग जंगलात लढत आहे, तर तेवढीच लोकं शहरात संभ्रम तयार करण्याचं काम करत आहेत. मला अालेली धमकीची पत्रे पोलिसांना दिले आहेत.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हेही वाचा -
भीमा-कोरेगाव हिंसाचार: आरोपींना १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी
२००२ खंडणीप्रकरण: अबू सालेमला ७ वर्षांचा तुरुंगवास