चोरीच्या आरोपातून एका २१ वर्षीय तरुणानं मित्राची गळा चिरून हत्या केल्याची घटना विक्रोळीत उघडकीस आली आहे. गुरफान कुरेशा (२४) असं या मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांंनी शहाबाज उर्फ राजा खान याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.
शहाबाज आणि गुरफान हे मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवासी असून, जोगेश्वरीतील एका दुकानात काम करत होते. या दुकानात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या चोरीत शहाबाजचा हात असल्याची माहिती गुरफाननं मालकाला दिली होती. त्यामुळं शहाबाजच्या मनात गुरफानचा राग होता. त्यातून दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे.
सोमवारी रात्री दोघेही फिरण्यासाठी रिक्षानं गेले होते. खाडीजवळ दोघेही थांबले असताना दोघांमध्ये पुन्हा त्याच विषयावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, राग अनावर झालेल्या साहाबाजनं गुरफानवर चाकूनं हल्ला केला. गुरफानचा गळा चिरून साहाबादनं तिथून पळ काढला आणि धारावीत भावाच्या घरी जाऊन लपला.
स्थानिकांनी तातडीनं या घटनेची माहिती पोलिसांंना देत गुरफानला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेलं. त्यावेळी गुरफान मालकाला राजानं मला मारल्याचं फोनवरून सांगत होता. मात्र, गुरफानच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी शहाबाजवर हत्येचा गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.
हेही वाचा -
अफवा, खोट्या बातम्या, माहिती टाळण्यासाठी व्हॉट्सअॅपची ‘टिपलाइन’ सुविधा
आचारसंहितेमुळं मांजरांची नसबंदी लांबणीवर