वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर हल्ला करण्यात येणार असल्याचा मेल बीसीसीआयला पाठवण्यात आला होता. या प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने आसामहून एकाला अटक केली आहे. ब्रज मोहन दास असं या आरोपीचं नाव आहे. त्याने हे कृत्य का केलं हे अद्याप कळू शकलं नाही.
मूळचा आसामच्या मोरीगावचा असलेला ब्रज मोहन दास याने हा धमकीचा मेल थेट भारतीय संघाला न पाठवता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) पाठवला होता. हल्ल्याची धमकी देणाऱ्या दहशतवादी गटाच्या नावाचा उल्लेख मेलमध्ये त्याने केला नव्हता. या घटनेचं गांभीर्य ओळखून पीसीबीनं तात्काळ हा मेल बीसीसीआय आणि आयसीसीला फॉरवर्ड केला आहे. त्यानंतर बीसीसीआयनं याबाबत गृहमंत्रालयाला कळवलं होतं. या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली.
पोलिसांच्या तपासात पीबीसीला पाठवण्यात आलेला मेल हा आसाम येथून अनोळखी सर्वरच्या माध्यमातून पाठवला असल्याचं उघडकीस आलं. यात ब्रजचा सहभाग निश्चित झाल्यानंतर एटीएसने आसामहून २० आॅगस्ट रोजी त्याला अटक केली. ब्रजला आसाममधील दंडाधिकारी न्यायालयाने ट्रान्झिस्ट रिमांड दिला असून मुंबईतील एटीएस न्यायालयाने त्याला २६ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याजवळून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या सर्व इलेक्ट्राॅनिक यंत्रणा हस्तगत केली आहे.
हेही वाचा -
गटारावरची लोखंडी झाकणं चोरणारे अटकेत