निकालातील गोंधळाने आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या मुंबई विद्यापिठाला पुन्हा एकदा पेपर फुटीच्या प्रकरणाला तोंड देण्याची पाळी आली आहे. गुरवारी TYBMS च्या ई कॅामर्स आणि डिजीटल मार्केटिंगचा पेपर फुटल्याचे समोर आले असून या प्रकरणी अंबोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जणांना अंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचं यावेळी अंबोली पोलिसांनी सांगितलं आहे.
गुरुवारी सकाळी अंधेरीतील एम.व्ही.एम. महाविद्यालयात TYBMS ई कॅामर्स आणि डिजीटल मार्केटिंगचा पेपर सुरू होण्यापूर्वी एका विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका सापडली आणि एकच खळबळ उडाली. चौकशी केली असता कॅालेजमधील एका विद्यार्थ्याने ही प्रश्नपत्रिका या मुलीला पाठवल्याचे समोर आले. इतरांकडे देखील प्रश्नपत्रिका असल्याचं समोर येताच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड व इतर परिक्षांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहार अधिनियम 1982 कलम 5, 6 व 8 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66(ड) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती अंबोली पोलिसांनी दिली आहे.
मुंबई विद्यापिठाने पेपर फुटीला आळा घालण्यासाठी काही विशेष उपाययोजना केल्या होत्या. परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकांची ई-डिलिव्हरी करण्यात येते. यावेळी महाविद्यालयात प्रश्नपत्रिका डाउनलोड करून त्या महाविद्यालयाचे नाव वाॅटरमार्क स्वरूपात प्रश्नपत्रिकेवर प्रिंटही केले जाते. या प्रकरणात सापडलेल्या प्रश्नपत्रिका या एम.व्ही.एम. महाविद्यालयाच्या नसल्याची माहिती मिळत आहे.
13 नोव्हेंबरपासून बीएमएसच्या पाचव्या सत्राची परीक्षा सुरी झाली असून, पहिले तीन पेपर 13, 14 आणि 15 नोव्हेंबरला पार पडले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून यापुढेही परीक्षा सुरळीतपणे सुरू राहणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा