विविध संशोधनासाठी नामांकित असलेल्या आयआयटी मुंबईत आता वाया जाणाऱ्या अन्नापासून बायोगॅस निर्मिती करण्यात येणार आहे. १९९० सालच्या बॅचने आयआयटी मुंबईला रिटर्न गिफ्ट म्हणून हे बायोमिथेनेशन प्लांट (biomethanation plant) दिलं आहे. नुकतंच आयआयटी मुंबईचे प्रमुख प्रो. देवांग कक्कर यांच्या हस्ते या बायोमिथेनेशन प्लांटचं उद्धाटन करण्यात आलं. यावेळी १९९० सालचे विद्यार्थीही उपस्थित होते.
जगभरात आपल्या संशोधन व विविध अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी मुंबईची ख्याती दूरवर पसरली आहे. याच आयआयटीतून शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी भरपूर मेहनत घेत असतात. अशा या आयआयटीतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पदवीला २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर आयआयटीला देणगी देण्याची प्रथा आहे. या देणगीतून प्रयोगशाळांची निर्मिती, नव्या इमारतींची निर्मिती व गरजू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींची व्यवस्था करण्यात येते.
गेल्या अनेक वर्षापासून ही प्रथा सुरू असून काही दिवसांपूर्वी १९९३ सालीच्या बॅचनं २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल २५ कोटी रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर आता १९९० सालच्या बॅचनं वाया जाणाऱ्या अऩ्नापासून बायोगॅस निर्मिती करणारी अत्याधुनिक यंत्रणा आयआयटी मुंबईला गिफ्ट केली आहे. यातून दर दिवशी २ टन गॅसची निर्मिती करण्यात येणार आहे. या यंत्रणा आयआयटीच्या १२, १३ आणि १४ यांसह इतर होस्टेलच्या मेसमधून वाया जाणाऱ्या अन्नातून बायोगॅसची निर्मिती करणार आहे. यातून निर्माण होणाऱ्या गॅसमधून होस्टेलमधील मेसमध्ये जेवण तयार करण्यास मदत होणार असून आयआयटीत एलपीजी गॅसच्या वापरात २५ टक्क्यांनी कपात होणार आहे.
हेही वाचा-
स्काऊट गाईड, एनसीसीच्या विद्यार्थ्यांनाही वाढीव गुणांची सवलत