मुंबईसह राज्यभरातील इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशादरम्यान जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी, मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना १० ऑगस्टपर्यंत हा कालावधी देण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या प्रवेश नियामक प्राधिकरण आणि सीईटी सेलतर्फे सप्टेंबर २०१७ ला नवी नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना इतर शैक्षणिक कागदपत्रांसोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती.
सरकारनं घातलेल्या या अटीमुळ विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना जात पडताळणी प्रमाणपत्राबाबतचा रकाना न भरल्यानं अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे अनेक इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्यानं त्यांचं शैक्षणिक नुकसान झालं. या जाचक प्रक्रियेमुळ इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए या अभ्यासक्रमांव्यतिरिक्त आर्टस् आणि कॉमर्स या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत असल्याचं दिसून येत होतं.
जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया किचकट असल्यानं महाविद्यालयीन प्रवेशासाठी का होईना, दहावी बारावीसह अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मुंबईसह ठिकठिकाणच्या सेतू केंद्रात पालक आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा -