विद्यार्थी आणि पालकांमध्ये अकरावीचे प्रवेश कसे होणार याबाबत संभ्रम होता. अखेर शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश (11th admission) प्रक्रियेसाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा (CET exam) घेण्याचं जाहीर केलं आहे. ही परीक्षा जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे,
अकरावी प्रवेशासाठी होणारी परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. ही परीक्षा १०० गुणांची असणार आहे. कोरोनामुळे १० वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे दहावीचा निकाल कशापद्धतीने लावणार, अकरावीचे प्रवेश कशा पद्धतीने होणार, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे अकरावीला सरसकट प्रवेश देण्यात यावा, तर अकरावीसाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्याची मागणी केली जात होती.
आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्या राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आणि अन्य आंतरराष्ट्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
२०२१-२१ शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता १० वीच्या परीक्षेचा अर्ज भरलेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेलं असल्यानं त्यांना सीईटीसाठी शुल्क भरावे लागणार नाही. पण, सीबीएसई, आयसीएसई आणि अन्य आंतरराष्ट्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून निश्चित केलेलं शुल्क भरावे लागणार आहे.
ही सीईटी प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे. ही परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील. २ तासांची परीक्षा घेण्यात येईल. यात इंग्रजी,गणित,विज्ञान,सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. ही परीक्षा ऑफलाइन स्वरूपात घेण्यात येणार आहे.
हेही वाचा -