केंद्र प्रमुख शैक्षणिक नेतृत्व विकास कार्यक्रमात कार्यरत असताना केंद्र प्रमुखांनी प्रशासकीय अधिकारी नाही तर शिक्षणदूत म्हणून काम करावं. कारण आपण मूळ शिक्षकच आहात आणि तळागाळापर्यंतच्या मुलांपर्यंत आपल्याला शिक्षण पोहचवायचं आहे, असं प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केलं.
केंद्र प्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रम गुरुवारी कुलाबा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी तावडे बोलत होते. केंद्र प्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रम सुरू झाल्यापासून महाराष्ट्रानं शिक्षण क्षेत्रात प्राथमिक स्तरावर प्रगती केली आहे.
माध्यमिक स्तरावर आणखी प्रगती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र प्रमुखाने अध्ययन निश्चितीसाठी पायाभूत विश्लेषण करावे. शेवटच्या पातळीवरील विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढेल आणि शैक्षणिक विकास होईल याकडे लक्ष द्यावं, असंही तावडे यावेळी म्हणाले.
विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी शिक्षकांनी कसं शिकवावं, याबाबत शासनाने वेळोवेळी नियम केले आहेत. युनिसेफ त्याचप्रमाणे काम करत आहे. केंद्र प्रमुखाने आपल्यातील शिक्षक सतत जागा ठेवून मुलांना अधिकचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर प्रभावी निरीक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी लक्षात घेऊन त्या अडचणी सोडवण्यासाठी योग्य कृती आराखडा तयार करावा. त्यामुळे आपल्याला शैक्षणिक प्रगती साधता येईल, असंही तावडे म्हणाले.
तावडे यांच्या हस्ते केंद्र प्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रमाचे सादरीकरण आणि कार्यक्रम पुस्तिकेचं अनावरण करण्यात आलं. त्याचबरोबर राज्यातील केंद्र प्रमुख शैक्षणिक नेतृत्व उपक्रमातील १८ जणांना 'मास्टर फॅसिलिटेटर' बॅच लावून सन्मानित करण्यात आलं.
यावेळी शालेय शिक्षण अपर मुख्य सचिव डॉ. वंदना कृष्णा, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. सुनिल मगर, उपसंचालक नेहा बेलसरे, युनिसेफच्या महाराष्ट्रातील प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, युनिसेफच्या शिक्षण विभागाच्या भारतातील प्रमुख युफ्रेंट्स ओसी, युनिसेफच्या महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ डॉ. रेश्मा अग्रवाल तसेच राज्यातील गटशिक्षण अधिकारी केंद्र प्रमुख उपस्थित होते.