अकरावी प्रवेशाची विशेष फेरी राबवल्यानंतरही हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वानुसार प्रवेशफेरी पार पडणार आहे. ही प्रवेशप्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशानं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेप्रमाणे तीन गट करण्यात आले आहेत. या प्रत्येक गटानुसार दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेशाचा पर्याय प्रथम निवडणाऱ्या विद्यार्थ्याला रिक्त जागांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया येत्या २५ ऑगस्टपासून ते २ सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे.
अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीनंतरही तब्बल ९ हजार ००९ विद्यार्थी प्रवेशाविना वंचित आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसह कॉलेजमध्ये प्रवेश मिळूनही तो निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान 'प्रथम प्राधान्य' तत्त्वानुसार प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
यासाठी ८० ते १०० टक्के, ६० टक्के आणि त्यावर गुण मिळवणारे आणि ३५ टक्क्यांवरील गुण असलेल्या विद्यार्थ्यांचं तीन गटांमध्ये विभाजन करण्यात आलं आहे. या प्रवेशप्रक्रियेपूर्वी कॉलेजांतील रिक्त जागांचा तपशील शनिवार, २५ ऑगस्ट रोजी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.