काही दिवसांपूर्वी दहावीच्या फेरपरीक्षांचा निकाल जाहीर झाला असून यात मुंबई विभागातील ४ हजार ७४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेता येणार असून या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या बुधवारी ५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील.
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात अकरावीसाठी ४ नियमित फेऱ्या आणि एका विशेष फेरीच आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्यानं काही दिवसांपूर्वी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार प्रवेशफेरी राबवण्यात आली. या फेरीनंतरही अनेक विद्यार्थी प्रवेशाविना वंचित असल्यानं आता प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य याची दुसरी फेरी पार पडणार आहे.
ही प्रवेशप्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशानं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेप्रमाणं ३ गट करण्यात आले असून त्या गटात दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. या प्रत्येक गटानुसार दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेशाचा पर्याय प्रथम निवडणाऱ्या विद्यार्थ्यांला रिक्त जागांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया येत्या ४ सप्टेंबरपासून १२ सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे.
येत्या ४ व ५ सप्टेंबरला अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटवर प्रवेश रद्द करण्याची लिंकही देण्यात आली आहे. तसंच विद्यार्थ्यांनी आधीची प्रवेश नोंदणी रद्द केल्यानंतरच विद्यार्थ्यांना नव्यानं नोंदणी करता येणार आहे. त्याशिवाय दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या मार्गदर्शन केंद्रावर माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अकरावीच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य याच्या दुसऱ्या फेरीसाठी प्रामुख्यानं ६० टक्के आणि त्यावर गुण असलेले आणि ३५ टक्क्यांवरील गुण असलेले विद्यार्थी सहभागी होणार आहे. या प्रवेशप्रक्रियेतील कॉलेजातील रिक्त जागांचा तपशील बुधवार, ५ सप्टेंबर रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
हेही वाचा-
दहावी फेरपरीक्षेत मुंबईचा निकाल सर्वात कमी!
१७ नंबरचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ