महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येणार असून या निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे. यंदा बारावीप्रमाणे दहावीच्या निकालाची टक्केवारी घसरली असून फक्त २३.६६ टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी १४.२१ टक्के इतका लागला आहे.
यंदाच्या जुलै-ऑगस्ट २०१८ मध्ये मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागातून १ लाख २२ हजार ०१७ विद्यार्थी परीक्षेला नोंदणी केली असून त्यापैकी १ लाख २१ हजार ०५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी फक्त २८ हजार ६४५ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल २३.६६ टक्के इतका आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अकरावीच्या नियमित प्रवेशास पात्र ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १७ जुलै ते २ ऑगस्ट २०१८ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागांचा निकाल एकाच वेळी जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेला मुंबई विभागातून एकूण ३३ हजार ३९७ विद्यार्थी बसले होते. यातील फक्त ४ हजार ७४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुंबईचा निकाल १४.२१ टक्के लागला आहे. या फेरपरीक्षेतील औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वाधिक ३२.८३ टक्के इतका लागला असून मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी १४.२१ टक्के लागला आहे.
तसंच या फेरपरीक्षेतील एकूण ६० हजार ५५४ विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झाले असून, हे विद्यार्थी एटीकेटी सवलतीद्वारे अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरणार आहे. फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या सप्टेंबरपासून पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. तर फेरपरीक्षेमध्ये सगळ्या विषयांत अनुत्तीर्ण झालेल्यांना मार्चमध्ये पुन्हा परीक्षा देता येईल.
हेही वाचा-
धक्कादायक! मुंबईतील ४० टक्के तरूणाई तणावग्रस्त
१७ नंबरचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ