गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात रखडलेल्या शिक्षक भरतीचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनातर्फे येत्या काही दिवसात विविध विद्यापीठ आणि कॉलेजात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या रिक्त जागा असलेल्या विविध कॉलेजांमध्ये भरती करण्यासाठी शासनातर्फे परवानगी देण्यात आली असून तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी १ नोव्हेंबर रोजी शिक्षक भरतीबाबतची घोषणा केली.
गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यापीठ व कॉलेजांमध्ये अनेक पदे रिक्त असल्यानं अनेक ठिकाणी फक्त तासिका तत्वावर शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. या सर्व कारणामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान लक्षात घेऊन थेट अध्यापक भरती करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला आहे. यानुसार येत्या काळात ४ हजार ७३८ जागा भरण्यात येणार अाहेत. यामध्ये अध्यापकांसाठी ३ हजार ५८० जागा, शारिरीक शिक्षण संचालनालय १३९ जागा, ग्रंथपाल १६३ जागा, प्रयोगशाळा सहाय्यक ८५६ जागा असणार आहेत.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील शिक्षकांची भरती गुणवत्तेवर आधारित व पारदर्शक पद्धतीनं व्हावी यासाठी शिक्षण विभागानं 'पवित्र' या वेबपोर्टलची निर्मिती केली होती. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थांच्या शाळांमधील अनुदानित, अंशत: अनुदातिन व विनाअनुदानित अशा सर्व प्रकारच्या शाळांमधील शिक्षकांची भरती करण्यात येणार होती.
त्याशिवाय तासिका तत्वावरील अनेकांचे बहुतांश शिक्षकांचं मानधनही दुप्पट करण्यात येणार असून त्यातही घसघशीत वाढ करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर कॉलेज आणि विद्यापीठातील ही पदभरती उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रचलित धोरणानुसार केली जाईल, असंही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा -
विद्यापीठातील कंत्राटी सुरक्षा रक्षक कुटुंबासह उपोषणावर