नुकताच राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा एकूण निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे. या परीक्षेसाठी एकूण १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यात फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. लवकरच या परीक्षांचं वेळापत्रकही जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याकरीता जुलै-ऑगस्ट २०१५ मध्ये प्रथमच दहावीची फेरपरीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १०वी आणि १२वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर ऐवजी जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली होती. त्यानुसार २०१५ सालापासून १०वी व १२वीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्ट दरम्यान घेण्यात येते.
१२वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात त्यांच्या गुणपत्रिकांचं वाटप मंगळवारी १२ जून रोजी दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशीपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या कॉपीसाठी अर्ज करू शकणार आहेत. तसंच यंदा या दोन्ही गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना एकच अर्ज भरायचा असून गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची कॉपी यात दिलेल्या चौकटीवर टिकमार्क करावी लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी गुणपत्रिकेची प्रिंटआऊट अर्जाला जोडणे आवश्यक असणार आहे.
गुण पडताळणीसाठी अर्ज हे ३१ मे ते ९ जूनपर्यंत महाविद्यालयात उपलब्ध असणार आहेत. तर उत्तरपत्रिकेच्या कॉपीसाठी ४०० रूपये भरून गुरूवारी ३१ मे पासून १९ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.