यावर्षी ऑनलाईन असेसमेंटच्या गोंधळामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे निकाल रखडले. त्यामुळे दूर व मुक्त अध्ययन संस्थे (आयडॉल)चे प्रवेशही लांबले. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण मुंबई विद्यापीठाने 'आयडाॅल'च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये(शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ च्या)ची मुदत वाढवली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत प्रवेशाचे अर्ज भरता येतील.
मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेमध्ये पदवी आणि पद्व्युत्तर अभ्यासक्रमाचं शिक्षण दिलं जातं. ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अपुरे राहीले असेल किंवा ज्यांना नोकरी करता करता शिकण्याची इच्छा आहे, असे विद्यार्थी 'आयडॉल'साठी प्रवेश घेतात. दरवर्षी जून महिन्यात 'आयडॉल'साठी प्रवेश प्रक्रिया केली जाते. मात्र यावर्षी ऑनलाईन असेसमेंटच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे निकाल रखडले. त्यामुळे यावर्षी होणारा 'आयडॉल' प्रवेशही लांबला.
यावर्षी केवळ ५१, ७०० विद्यार्थ्यांनी 'आयडॉल'ला प्रवेश घेतले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा सावळा गोंधळ बघता विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, इंदिरा ओपन विद्यापीठाला पसंती दर्शवली. या कमी झालेल्या प्रवेशाचा फटका मुंबई विद्यापीठाच्या तिजोरीला बसला. यामुळे विद्यापीठाचं अंदाजे २ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
हेही वाचा -
मुंबई विद्यापीठाचे 'दिवस फिरले'! इंजिनीअरींगच्या परीक्षेसाठी 'जून २०१७' चं वेळापत्रक केलं तयार