उत्तरपत्रिका गहाळ झाल्यामुळे निकाल राखून ठेवलेल्या २३०० विद्यार्थ्यांचे निकाल मुंबई विद्यापीठाने मंगळवारी जाहीर केल्याने या विद्यार्थ्यांनी अक्षरश: सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आले आहेत.
परीक्षा मंडळांच्या बैठकीत ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सरासरी गुण देण्याची नियमावली करून या २३०० विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील.
प्रत्येक विद्यार्थ्याची विषयांसह गुणांची आणि हजेरीची तपासणी करुन त्या विद्यार्थ्याला गुण बहाल करण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आले आहेत, त्या विद्यार्थ्यांची नावे आणि गुण संकेतस्थळावर देण्यात आली आहेत.
- डॉ. अर्जुन घाटुळे, प्रभारी परीक्षा नियंत्रक
विद्यार्थ्याची ज्या विषयाची उत्तरपत्रिका हरवलेली आहे. त्या विषयासाठी इतर विषयात मिळालेल्या गुणांच्या सरासरीनुसार गुण देण्यात आले आहेत. यांत एका विषयाची उत्तरपत्रिका हरवल्याचं प्रमाण ९० टक्के एवढे असून २ विषयांच्या उत्तरपत्रिका हरवल्याचं प्रमाण १० टक्के आहे.
पुनर्मुल्यांकनासाठी आलेल्या ५२,६४१ अर्जांपैकी २०,८०२ एवढे निकाल मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहेत. तर उर्वरीत ३१,८३९ अर्जांचे निकाल जाहीर होणे बाकी आहेत.
हेही वाचा -
दिवाळीच्या सुट्टीतही प्राध्यापकांना करावी लागणार पेपर तपासणी