देशातील अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण तसंच इतर पदवी प्रवेशासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जेईई-मेन परीक्षेच्या पेपर १ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे ही परीक्षा घेण्यात आली असून या परीक्षेत राज आर्यन अग्रवाल हा देशातून दुसरा तर महाराष्ट्रातून पहिला आला आहे. विद्यार्थ्यांना https://jeemain.nic.in/webinfo/Public/Home.aspx या वेबसाईटवर आपला निकाल पाहता येणार आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात येणाऱ्या जेईई मेन परीक्षेचा पेपर एक ९ ते १२ जानेवारी दरम्यान घेण्यात आला होता. या परीक्षेला एकूण ९ लाख २९ हजार १९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ८ लाख ७४ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. देशभरातील २५८ शहरातील ४६७ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती.
या परीक्षेचा पेपर १ चा निकाल ३१ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार होता. मात्र इंजनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दोन आठवड्याआधी हा निकाल लवकर जाहीर करण्यात आला आहे. शनिवारी १९ जानेवारी रोजी हा निकाल जाहीर झाल्यानं अनेक विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान यंदाच्या वर्षीपासून जेईईचे निकाल टक्केवारीत देण्यात येणार असल्यानं एकापेक्षा अधिक टॉपर मिळू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे लवकरच जेईई मेन परीक्षेचा दुसरा पेपरचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात एकूण १५ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी १०० टक्के गुण मिळवले असून यात महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज आर्यन अग्रवाल, अंकित कुमार मिश्रा, क्रार्तिकेय चंद्रेश गुप्ता या तिघांनी १०० टक्के गुण मिळवले असून हे तिघेही महाराष्ट्रातील आहेत.
हेही वाचा -
मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. अजय देशमुख व परीक्षा संचालकपदी डॉ. विनोद पाटील
मनसे आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये तु तु मैं मैं