अभिनेते अनुपम खेर यांनी मोदी सरकारवर देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन निशाणा साधला आहे. कोरोनाच्या संकटकाळात सरकार कुठे न कुठे कमी पडले असून स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं हे महत्वाचं असल्याची टीका अभिनेते अनुपम खेर यांनी केली आहे.
एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हे मत अभिनेता अनुपम खेर यांनी व्यक्त केलं आहे. मोदी सरकारवर अनुपम खेर यांनी केलेल्या या टीकेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याचंही दिसून आलं आहे.
सरकारची प्रतिमा निर्मिती करण्याचा प्रयत्न आणि काही नद्यांमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांचे प्रेत दिसत असल्यासंबंधी एक प्रश्न अनुपम खेर यांना विचारण्यात आला होता. त्यावर अनुपम खेर म्हणाले की, सरकारवर या प्रकरणात जी टीका होतं आहे, ती योग्य असून या परिस्थितीत सरकारनं ते काम करावं ज्यासाठी त्यांना निवडून दिलं आहे.
आज जी काही परिस्थिती देशात निर्माण झाली आहे, त्यामुळे कोणालाही वेदना होऊ शकतात. देशातील नद्यांमध्ये तरंगणारी प्रेते यावरून कोणत्याही राजकीय पक्षानं राजकारण करण्याची ही वेळ नाही. देशातील एक जबाबदार नागरिक या नात्यानं आपण सरकारला जाब विचारला पाहिजे, आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत, असं अनुपम खेर म्हणाले.
हेही वाचा