“गायी-म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोकं सहन करतील; पण हा आवाज सहन होत नाही”, असं म्हणत प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर रोकठोक शब्दांत टीका केली आहे. अमृता फडणवीस यांचं एक नवं गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेले महेश टिळेकर आपल्या परखड कमेंटसाठी ओळखले जातात. त्यांनी याच पद्धतीने अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर भाष्य केलं आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट टाकताना म्हटलं आहे की, हिला नको गाऊ द्या...
चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही. पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते, लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायलं जातं असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते, अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे?
हेही वाचा- महाराष्ट्र कुठेही नेला असो, पण बिहार...अमृता फडणवीसांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं
गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील, पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचं नाव घेत नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे " आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? केवळ या अश्या गायिकेला प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सिरीज सारखी, नेहमीच बिझिनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे,? त्यामागे काय लागेबांधे आहेत ? हे एक न सुटणारे कोडे आणि जर या गायिकेकडे स्वतःचा अतिरिक्त खूपच पैसा असेल तर तिने एखादं संगीत विद्यालय सुरू करून नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षकांचं मार्गदर्शन होईल यासाठी स्वतः न गाता फक्त संगीत सेवा करावी.
पण काहीही म्हणा लता मंगेशकर यांनी गायलेल्या " आज अमृताचा घनु..या ओळीतील अमृता हा शब्द लता दीदींच्या मुखातून ऐकायला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवितून वाचायलाच योग्य वाटतो. इतरांनी फक्त त्या अमृता नावाची किमान लाज राहील याचा तरी प्रयत्न करावा.
असं म्हणत महेश टिळेकर यांनी नवोदित गायकांच्या व्यथेकडे देखील लक्ष वेधलं आहे.