टेलिव्हिजनवर लोकप्रिय असलेल्या 'द कपिल शो' या कार्यक्रमातील परीक्षक नवज्योत सिंग सिद्धू यांची या शोमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. १४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आहे. एका बाजूला पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्या, पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी करण्यात येत असताना सिद्धू यांनी मात्र पाकिस्तानसोबत चर्चा केली पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. यामुळेच सिद्धू यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
१४ फेब्रुवारीला पुलवामा या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. यानंतर पाकिस्तानला जशाच तसं उत्तर देण्याची मागणी संपूर्ण देशभरातून होत असताना सिद्धू यांनी मात्र बेताल वक्तव्य करत पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. अनेक राजकारणी आणि कलाकारांनी पुढे येऊन शहिदांना मदत करत श्रद्धांजली वाहत असताना सिद्धू यांनी मात्र अकलेचे दिवे लावत मूठभर लोकांसाठी तुम्ही पाकिस्तानला दोष का देता असा प्रश्न ट्विटरवर विचारला होता. मी झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो, मात्र पाकिस्तानशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला पाहिजे अशी प्रतिक्रिया सिद्धू यांनी दिली होती.
या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांनी सिद्धू यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यावेळी अनेकांनी त्यांना 'कपिल शर्मा शो'मधून हाकलून द्या, अन्यथा शो बंद करा अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे नेटकऱ्यांनी तर #BoycottSidhu, #BoycottTheKapilSharmaShow यांसारखे विविध हॅशटॅग ट्विटर ट्रेंडही केले होते. नेटकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेता, कपिल शर्मा शो प्रसारीत करणाऱ्या सोनी वाहिनीनं सिद्धूंची ताबडतोब हकालपट्टी करण्याच्या सूचना प्रॉडक्शन हाऊसला दिल्या. त्यानुसार प्रॉडक्शन हाऊसनं सिद्धू यांना घरचा रस्ता दाखवला. या निमित्तानं सिद्धूंची कायमस्वरूपी गच्छंती करण्यात आली असून, त्यांच्या जागी आता अर्चना पूरण सिंग या शो मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा -
पालिका शाळांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट
आंगणेवाडी जत्रेसाठी १० स्पेशल गाड्या