राज्यातून परतीच्या पावसाला आजपासून सुरुवात झाली आहे. पुढच्या २४ तासात बहुतांश भागातील पाऊस माघारी निघेल, असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख दत्तात्रय होसाळीकर यांनी वर्तवला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना होसाळीकर यांनी आज महाराष्ट्रातून मान्सूनची माघार सुरू झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही भाग, उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि उत्तर कोकणातून मान्सूनने माघार घेतली आहे. परतीच्या पावसाचा हा प्रवास डहाणू, नाशिक, नांदेड आणि नलगोंडा (तेलंगाणा) आणि इतर भागातून होत आहे. या भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता देखील दत्तात्रय होसाळीकर यांनी वर्तवली आहे. (monsoon withdrawal has started from maharashtra today says IMD mumbai chief dattatray hosalikar)
यंदाच्या परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा दणका दिला. अतिवृष्टीमुळे हातातोंडाला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पूराच्या पाण्याने बांध, रस्ते, पूल वाहून गेले, काहींची घरदारं उद्ध्वस्त झाली. या नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर करण्यात आलं आहे.
हेही वाचा- नुकसानग्रस्तांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर- उद्धव ठाकरे
Monsoon withdrawal has started from Maharashtra today 🌤️🌤️
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 26, 2020
Monsoon has withdrawn from Vidarbha, parts of Marathwada, parts of North Madhya Maharashtra and North Konkan today. Withdrawal line passes through Dahanu,Nasik ,Nanded and further into Nalgaonda (Telangana) & further.
शेतीचं झालेलं नुकसान, वाहून गेलेली शेती, खरडून गेलेली शेती, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उध्वस्त झाले असतील, विजेचे खांब पडले असतील, दळणवळण यंत्रणा असेल, या सर्व गोष्टींसाठी ₹ १०,००० कोटी आम्ही जाहीर करत आहोत. दिवाळीपर्यंत ही पूर्ण मदत प्रत्येक आपत्तीग्रस्तापर्यंत पोहोचावी, असा आमचा प्रयत्न राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत जाहीर करताना सांगितलं.
जिरायत, बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टर ६,८०० रुपये ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी १०,००० रुपये इतकी देणार आहोत. फळपिकांसाठी १८,००० रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५,००० रुपये प्रति हेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत) मदत करण्यात येईल. मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी, घरपडझडीसाठी वाढीव मदत देण्यात येईल, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.