मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे २२ आणि २३ ऑक्टोबरला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागील अनेक दिवस मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा आला होता. मात्र आता हा अडथळा दूर झाला आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, देशातील अनेक राज्यांमध्ये गुरूवारी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनारीपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी नागालँड, मिझोरम व त्रिपुरा आणि शनिवारी आसाम व मेघालयात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. त्याचबरोबर राज्यात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावेल. किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळेल असं हवामान खात्याने म्हटलं आहे.
राज्यात मागील काही दिवस अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना झालेल्या पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात नुकसान झाले. सोयाबीन, भात, कापूस, ऊस, हळद, तूर या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला.