मुंबईला स्वप्ननगरी म्हणून ओळखलं जातं. मात्र या स्वप्ननगरीत सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलं आहे. मेट्रोसहित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमुळे मुंबईतील प्रदूषणाचं प्रमाण धोकादायक पातळीच्याही वर गेलं आहे. २०१८ या वर्षात मुंबई शहर महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर ठरलं आहे. तर भारतातील प्रदूषित शहरांमध्ये मुंबई २७ व्या स्थानावर आहे. ग्रीनपीस आणि एअर व्हिजुअल या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
सर्वेक्षणानुसार, बिजिंग शहरातील प्रदूषणाच्या तुलनेत मुंबईत प्रदूषण अधिक आहे. काही वर्षांपूर्वी बिजिंग जगातील सर्वात प्रदूषित शहर होतं. जगात प्रदूषित शहरांमध्ये मुंबई ७१ व्या स्थानावर आहे. २०१८ मधील सर्वेक्षणात राज्यातील ८ शहरांमधील प्रदूषणाची तुलना करण्यात आली आहे. एअर व्हिजुअल या संस्थेने प्रथमच आंतरराष्ट्रीय एनजीओ ग्रीनपीसशी हातमिळवणी करत हे सर्वेक्षण केलं आहे.
अहवालानुसार, मुंबईच्या प्रदूषणाचं प्रमाण वार्षिक सरासरी ५८.६ मायक्रोग्राम प्रति घन मीटर (एमपीसीएम) आहेे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) १० एमपीसीएम हे प्रदूषणाचं प्रमाण सुरक्षित असल्याचं निश्चित केलं आहे. डब्ल्यूएचओने निश्चित केलेल्या या प्रमाणापेक्षा मुंबईतील प्रदूषण पाचपट अधिक तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड (सीपीसीबी) च्या सरासरीनुसार १.५ पट जास्त आहे.
जगातील सर्वात अधिक २० प्रदूषित शहरांमध्ये भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशमधील १८ शहरं आहेत. तर जगातील सर्वाधिक २० प्रदूषित शहरांमध्ये भारतातील १५ शहरं आहेत. या शहरांमध्ये दिल्ली ११ व्या स्थानवर आहे. दिल्लीमध्येही प्रदूषणाचं प्रमाण धोकादायक पातळीवर गेलं आहे.
हेही वाचा -
ज्येष्ठ प्रवाशांंसाठी एसटीची स्मार्ट कार्ड योजना सुरु
ठाणे शहरासाठी आता वर्तुळाकार मेट्रो