मुंबई शहरात ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सामजिक न्याय विभागांतर्गत वसतिगृहाच्या माध्यमातून रहाण्याची व्यवस्था करण्यात येते. अशा मुंबई जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातील समाजकल्याणच्या वसतिगृहाला विमल आव्हाड नावाची 60 वर्षांची महिला गेली 30 वर्षे अन्न पुरवठा करत आहे.
साल 1987 पासून मुलांना घरगुती डबे पुरवण्याचे काम विमल आव्हाड यांनी केले. त्यावेळी सरकारी वसतिगृहांना मेसची सुविधा देखील नव्हती. विमल आव्हाड यांनी 1990 साली स्वतःची मेस सुरू केली. त्यावेळी विमल यांना समाज कल्याण विभागाकडून गोरेगाव शास्त्रीनगर येथील आदिवासी गौतम वसतिगृहाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
त्यानंतर विमल आव्हाड यांनी अन्नपूर्णा औद्योगिक संस्था 25 जून 1993 साली स्थापन केली. नंतर जोगेश्वरी, वरळी, चेंबूर, मुलुंड असे वेगवेगळ्या वसतिगृहाचे कॉन्ट्रॅक्ट संस्थेला मिळत गेले. सध्या संस्थेत 51 सदस्य आहेत. संस्थेंतर्गत अन्नपदार्थ बनवणे, तसेच गृहोपयोगी वस्तू बनवण्याचे काम केले जाते. संस्थेतल्या महिला लोणचे, पापड, जेवण बनवून देणे असे अन्नपदार्थ बनवतात. गेल्या 10 वर्षांपासून कांदिवलीसह उपनगरातील 12 अंगणवाडीतील चिमुकल्यांना अन्नपुरवठा करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जाते. 51 सदस्यांसह संस्थेत अनेक लोक कार्यरत आहेत.
जेमतेम शिक्षण असलेल्या विमल आव्हाड यांनी अवघ्या काही दिवसात वसतिगृहातील मुलांशी एक अतूट नाते तयार केले. आक्का यांच्या या कार्याला पूर्ण पाठिंबा दिला तो आक्का यांच्या पतीने. कालांतराने विमल आव्हाड यांना वसतिगृहातील विद्यार्थी प्रेमाने आक्का म्हणून लागले. सध्या सर्व अधिकारी वर्ग आणि वसतिगृहाशी संलग्न सर्वच लोक विमल आव्हाड यांना आक्का अशीच हाक मारतात. आज अक्कांच्या संस्थेमुळे अनेक महिलांना रोजगार निर्मिती झाली आहे. संस्थेच्या आधारस्तंभ असलेल्या आक्का सर्वच कामगार आणि विद्यार्थ्यांना दरदिवशी पोटभर अन्न मिळावे आणि प्रत्येकाची भूक भागवण्यासाठी रात्रंदिवस धडपडत असतात. सध्या वरळीमधील 3 शासकीय वसतिगृहामध्ये आणि चेंबूरमधील संत एकनाथ वसतिगृहात आक्का यांचा जेवणाचा ठेका सुरू आहे.
हेही वाचा -
जागर महिलाशक्तीचा : देवाला देवपण देणाऱ्या कलेचा वारसा जपणारी लेक
जागर महिलाशक्तीचा : धारावी झोपडपट्टीत पहिली महिला पतपेढी!