‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…’, या जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात आज सोमवारी पाच दिवसांच्या गणपतींना निरोप दिला जाणार आहे. यानिमित्ताने भाविकांच्या सुरक्षेसाठी पालिका आणि पोलिसांनी विसर्जनस्थळी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. याशिवाय गणपतीचं विसर्जन कृत्रित तलावात करण्याचं आवाहन पालिकेन केलं आहे.
दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचं मोठ्या थाटात विसर्जनानंतर आता पाच दिवसांच्या गणपती आणि गौरींना निरोप दिला जाणार आहे. यामध्ये घरगुती गणपतींसह काही सार्वजनिक मंडळांचा समावेश असेल. दुपारनंतर या विसर्जनाच्या मिरवणुका निघतील. यानिमित्ताने मुंबईतील गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, शिवाजी पार्क, मढ, आक्सा आणि मार्वे या समुद्र किनारी पोलिस आणि जीवरक्षक तैनात करण्यात आले आहे.
गणेश विसर्जनादरम्यान भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चौपाट्यांवर आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश महापालिका प्रशासनाने सर्व विभागांना दिले आहेत. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दल आणि मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे.