लॉकडाऊननंतर प्रथमच अंगारकी संकष्टी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिर खुले करण्यात आले आहे. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भक्त येत असल्याचं पहायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून सिद्धिविनायकाचे मंदिर बंद होते.
सोमवारी रात्री १.३० वाजता दर्शनला सुरुवात झाली. मंगळवारी संध्याकाळी ८.३० वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनसाठी खुले राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली होती.
अंगारकीनिमित्त भाविकांना मंदाराच्या सिद्धी आणि रिद्धी या दोन्ही प्रवेशद्वारातून दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, ज्या भाविकांकडे ऑनलाईन पास नाही, त्यांना श्री सिद्धिविनायकाचं दर्शन मिळणार नाही. तसेच व्हॉट्सअपद्वारे फोटोकॉपी आणि स्क्रीनशॉर्ट दाखवणाऱ्या भाविकांनाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. महत्वाचं म्हणजे, भाविकांना मंदिरात हार, फुल, नारळ, पूजेची सामर्गी आणि प्रसाद घेऊन जाण्यास मनाई करण्यात आलीय.
गेल्य दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्वच मंदिरे बंद होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर राज्यातील काही मंदिरे उघडण्यात आली मात्र, अद्यापही सिद्धिविनायक मंदिर बंद होते. त्यामुळे बाप्पाचे दर्शन घेता आले नाही.
पण अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराचे दरवाजे उघडल्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर बाप्पाचे दर्शन भाविकांना घेता आले.