मुंबईकरांना गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीच्या समस्येला सामोरं जावं लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, बडा मस्जिद, वांद्रे, जुहू चौपाटी आणि गणेश घाट, पवई या शहरातील ५ प्रमुख विसर्जन स्थळांवर वाहतूक पोलिसांनी नियंत्रण कक्ष उभारले आहेत. सोबतच विसर्जनादरम्यान वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी ठिकठिकाणी वाॅच टाॅवरदेखील लावण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी २८०० वाहतूक पोलिसांसोबत १००० ट्रॅफिक वाॅर्डन शहरातील रस्त्यांचा ताबा घेतील. सोबतच वाहतूक पोलिस प्रवासी आणि भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरीता स्वयंसेवी संस्थांची देखील मदत घेणार आहेत. यांत अनिरूद्ध अॅकॅडमी आॅफ डिझास्टर कंट्रोल, आरएसपी शिक्षक, सागरी सुरक्षा पथक, एनएसएस विद्यार्थी, स्काऊट-गाईड यांचा समावेश आहे.
भाविकांची गर्दी आणि विसर्जन मिरवणुकीच्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन मुंबई शहरातील वाहतुकीच्या मार्गांमध्ये १३ सप्टेंबर (गुरूवार), १४ सप्टेंबर (शुक्रवार), १७ सप्टेंबर (सोमवार), १९ सप्टेंबर (बुधवार) आणि २३ सप्टेंबर (रविवार) या दिवशी रात्री १२.०० ते सायंकाळी ६.०० वाजेदरम्यान बदल करण्यात आले आहेत.
वाहतूककोंडी, वाहन अपघातांच्या वेळेस उपयोगात येणारी उच्च क्षमतेची क्रेन देखील सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय मदत, प्रथमोपचार केंद्र देखील उभारण्यात आले आहेत.
हेही वाचा-
सर्वात जुन्या गणेश मंडळांना भेट दिलीत का?
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर टपाल तिकीटाचं लोकार्पण