Advertisement

पर्यावरण संवर्धनाचा 'ट्री गणेशा'


SHARES

गणेशोत्सवाचे दहा दिवस सगळीकडे धामधूम असते. पण विसर्जन झाल्यानंतर काहीतरी चुकल्यासारखे वाटत रहाते. पण आपला लाडका बाप्पा विसर्जनानंतरही आपल्यासोबत राहू शकतो. हे कसे शक्य आहे? हे शक्य झाले आहे ते मुंबईतले मूर्तिकार दत्ताद्री कोथूर यांच्या संकल्पनेमुळे. पर्यावरणरक्षणाचा महत्त्वाचा संदेश देण्यासाठी दत्ताद्री यांनी 'ट्री गणेशा'ची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे!



काय आहे 'ट्री गणेशा'?

'ट्री गणेशा'चे वैशिष्ट्य म्हणजे गणेशमूर्ती लाल माती आणि खतापासून बनवली जाते. या मूर्ती घडवताना त्यात भेंडीच्या बिया पेरल्या जातात. लाल मातीच्या या गणेशाला गेरुचा लाल रंग देऊन फिनिशिंग केले जाते. त्यानंतर ही मूर्ती कुंडीच्या आकाराच्या 'ट्रे'मध्ये ठेवली जाते. दीड दिवस, पाच दिवस किंवा दहा दिवस मूर्तीची पूजा केली जाते. शेवटच्या दिवशी घरातल्या टपातच तुम्ही मूर्तीचे विसर्जन करू शकता. लाल माती असल्याने मूर्ती लगेच पाण्यात विरघळते. विरघळलेली माती तुम्ही कुंडीत टाकू शकता. विसर्जनासाठी दुसरा पर्याय म्हणजे, बाप्पासोबत देण्यात आलेल्या ट्रेमध्येच मूर्तीला पाणी घालायचे. हा ट्रे तुमच्या गॅलरीत किंवा बागेत ठेवायचा. सहा-सात दिवस त्याला पाणी टाकले की, मूर्ती हळूहळू विरघळून बिया मातीत रुजतात. दोन आठवड्यांनंतर बियांना अंकुर फुटतो आणि त्याचे रोपटे होते. त्यामुळे विसर्जनानंतरही बाप्पा एका रोपट्याच्या माध्यमातून आपल्यासोबतच असतो.



माझ्या घरातूनच या संकल्पनेची सुरुवात केली. २०१५ साली माझ्या घरी लाल मातीचा एक गणपती तयार करून त्याची प्रतिष्ठापना केली. याचा एक व्हीडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला. साधा पण गोंडस अशा या बाप्पाची मूर्ती मुंबईकरांना भावली. त्यानंतर २०१६ मध्ये तब्बल ४०० ते ५०० मूर्तींची मागणी आली.

दत्ताद्री कोथूर, मूर्तिकार


दत्ताद्री यांनी यावर्षी बीडीडी चाळीत रिकामी जागा घेऊन 'ट्री गणेशा'साठी कार्यशाळा सुरू केली आहे. यामध्ये ९ इंचापासून ते १८ इंचापर्यंतचे ट्री गणेशा आहेत. ज्यांची किंमत २२०० ते ४५०० हजार रूपयांपर्यंत आहे. यावर्षी त्यांना ५०० हून अधिक मूर्तींची मागणी आली आहे.



वर्षागणिक ट्री गणेशाची मागणी वाढत आहे. फक्त सामान्य मुंबईकरांनाच ट्री गणेशा भावला नाही, तर सेलिब्रिटीही त्याच्या प्रेमात पडले आहेत. अभिनेता रितेश देशमुख, शिक्षण मंत्री विनोद तावडे, अनेक कलाकार आणि राजकारण्यांनी 'ट्री गणेशा'ला प्राधान्य दिले आहे. ऐवढेच काय तर नुकतेच सई ताम्हणकरने देखील बीडीडी चाळीतील दत्ताद्री यांच्या कार्यशाळेला भेट दिली होती. 



दरवर्षी विसर्जित केलेल्या मूर्ती लाटांबरोबर किनाऱ्यावर येतात, प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे पाण्याचे प्रदूषण होते. यावर उपाय म्हणून लाल माती, खत आणि भाज्यांच्या बिया यांपासून दत्ताद्री यांनी बाप्पा घडवला. दत्ताद्री यांच्या संकल्पनेमुळेच गणेशोत्सव इको-फ्रेंडली पद्धतीने तर साजरा करता येतोच, शिवाय उत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणाचेही संवर्धन होत आहे.



हेही वाचा - 

सई ताम्हणकरचा पर्यावरण पूरक 'ट्री गणेशा'!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा