एकीकडे भारतात 70वा स्वातंत्र्य दिवस साजरा होत होता. पण, दुसरीकडे चौधरी कुटुंबावर (बदलेले आडनाव) दुखाचा डोंगर कोसळला होता. कारण, चौधरी कुटुंबातील मुलीचा अपघात झाला होता. रेल्वे अपघातात जखमी झालेल्या नेहाने (बदललेले नाव) उपचारांना प्रतिसाद देणं बंद केलं होतं. डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केलं आणि कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण, नेहाचे अवयवदान करुन दुसऱ्या कोणाचा तरी जीव वाचेल या भावनेतून कुटुंबीयांनी अवयवदानाला होकार दिला.
वाकोल्यात राहणारी नेहा 11 ऑगस्टला रेल्वे अपघातात जखमी झाली. तातडीने तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. पण, प्रकृती ठीक होत नाही हे कळल्यानंतर 12 ऑगस्टला कुटुंबीयांनी तिला नानावटी रुग्णालयात दाखल केलं. पण, डोक्यावर जबर मार लागल्यामुळे नेहाने उपचारांना प्रतिसाद द्यायचा कमी केला. त्यानंतर तिला 14 ऑगस्टला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आणि काही सामाजिक संस्थांनी कुटुंबियांना अवयवदान करण्याबाबत विचारणा केली. 15 ऑगस्टला नेहाचे अवयवदान करण्यात आले.
19 वर्षीय नेहामुळे दोघांना जीवदान मिळालं आहे.
14 ऑगस्टला या मुलीला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर आम्ही घरच्यांशी चर्चा केली. त्यांना अवयवदानासाठी तयार करणं अवघड होतं. मात्र, मुलीच्या भावाने आणि वडिलांनी पुढाकार घेऊन अवयवदानाचा निर्णय घेतला. मुलीच्या दोन्ही किडनी आणि यकृताचं दान करण्यासाठी ते तयार झाले. पण, हृदय दान करण्याच्या परिस्थितीत ते नव्हते.
राहुल वासनिक, अवयवदान समन्वयक, नानावटी रुग्णालय
अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, एक किडनी आणि यकृत नानावटी रुग्णालयात असलेल्या एका 54 वर्षीय रुग्णासाठी वापरण्यात आलं. तर दुसरी किडनी जसलोक रुग्णालयात पाठवण्यात आली. मुंबईत आतापर्यंत झालेलं हे 34 वं अवयवदान आहे. गेल्या वर्षी मुंबईत 58 जणांनी अवयवदान केलं होतं.
हेही वाचा