एका बाजूला कोरोनाचा उद्रेक वाढत चाललेला असताना मुंबईसह राज्यातील काही भागात केवळ ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व ब्लड बँका, स्वयंसेवी संस्था व राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबीरांचं आयोजन करून राज्यातील रक्तसाठा वाढवण्यावर भर द्यावा, असं आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (rajendra shingne) यांनी केलं आहे.
राज्यात कोरोना विषाणूच्या (coronavirus) वाढत्या संसर्गामुळे परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. कोविड सेंटर, रुग्णालयांतील खाटा दिवसागणिक भरू लागल्या आहेत. ही परिस्थिती नियंत्रणांत आणण्यासाठी कडक निर्बंध लावले जात आहेत. एवढंच नाही, तर पुन्हा एकदा लाॅकडाऊन लावण्यावर देखील राज्य सरकारची गांभीर्याने चर्चा सुरू आहे. अशा स्थितीत रक्ताची कमतरता झाल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
हेही वाचा- लोकांनी मानसिकता ठेवावी, कडक निर्बंधांबाबत राजेश टोपेंचं वक्तव्य
राज्यात सध्या केवळ ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व ब्लड बँक्स, स्वयंसेवी संस्था व राजकीय नेत्यांनी पुढाकार घेत रक्तदान शिबीरांचे आयोजन करून राज्यातील रक्तसाठा वाढवण्यावर भर द्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. @DrShingnespeaks यांनी केले आहे. pic.twitter.com/WSTeExjvFO
— NCP (@NCPspeaks) April 1, 2021
यासंदर्भात माहिती देताना डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी अनेकवेळा जसा रक्तसाठ्याचा तुटवडा निर्माण झाला होता, तशीच काहीशी परिस्थिती सद्यस्थितीत निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणी ५ ते ६ दिवस आणि काही ठिकाणी १० दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा ब्लड बँकांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व ब्लड बँका, स्वयंसेवी संस्था व राजकीय नेत्यांनी पुढाकार घेत आपापल्या भागांत लहान-मोठ्या रक्तदान शिबीरांचं आयोजन करून राज्यातील रक्तसाठा वाढवण्यावर भर द्यावा, असं आवाहन शिंगणे यांनी केलं आहे.
दरम्यान, लाॅकडाऊनच्या बाबतीत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्याबाबतची चर्चा निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारे सुरू असते. सध्या लावण्यात आलेले निर्बंध अधिक कडक करण्याच्या दिशेने राज्य शासन पावलं उचलणारच आहे. त्या दृष्टीने लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे.
गर्दी टाळावी हाच त्यामागचा मुख्य दृष्टीकोन आहे. त्यामुळे गर्दी होणारी जी जी ठिकाणं आहे, तिथं अधिक कडक निर्बंध आणण्याच्या दृष्टीने आपण नियोजन करत आहोत. ते नक्की झालं, की त्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली.
(blood shortage in mumbai and maharashtra)