कोरोनाचा अधिक जोमानं मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करणं आवश्यक आहे. गर्दीवर नियंत्रण मिळाल्यासच ते शक्य होईल. यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी ५ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
१) राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीनं रोज निम्मे कर्मचारी येतील. या हिशोबानं कार्यालयं सुरू ठेवण्यात येतील.
२) रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी क्षमतेनं चालवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
३) मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येईल.
४) शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरवण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा अंतराने सकाळी आणि दुपारी सुरु होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल.
५) जनतेनं जीवनावश्यक वस्तुंचा, अन्नधान्य, औषधांचा साठा करू नये. राज्यातील जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात आणि सुरळीत असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जर कोणी व्यापारी साठेबाजी करीत असेल किंवा औषधांच्या, मास्कच्या किंमती अव्वाच्या सव्वा लावत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
६) दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध असेल. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहेत.