राज्यात बुधवारी कोरोना बाधित ५९७ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण संख्या ९९१५ झाली आहे. बुधवारी २०५ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत राज्यभरात १५९३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ७८९० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली.
१.६२ लाख होम क्वारंटाईनमध्ये
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ३७ हजार १५९ नमुन्यांपैकी १ लाख २६ हजार ३७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ९९१५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६२ हजार ८६० लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quraintine) असून १० हजार ८१० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
हेही वाचा - राज्यात बुधवारी दिवसभरात 597 नवीन रुग्णांची नोंद, तर 32 जणांचा मृत्यू
क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना (cluster containtment) अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ७२३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून बुधवारी एकूण ९८११ सर्वेक्षण पथकांनी काम केलं असून त्यांनी ४०.४३ लाख लोकसंख्येचं सर्वेक्षण केलं आहे.
३२ कोरोनाबाधितांचा मृत्यू
बुधवारी राज्यात ३२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४३२ झाली आहे. बुधवारी झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईचे २६, तर पुणे शहरातील ३ आहेत. या शिवाय सोलापूर शहरात १, औरंगाबाद शहरात १ आणि पनवेल शहरात १ मृत्यू झाला आहे.
या मृत्यूंपैकी २५ पुरुष तर ७ महिला आहेत. झालेल्या ३२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. या ३२ रुग्णांपैकी १८ जणांमध्ये (५६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.