बुधवारी १२३३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचं निदान झाल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. त्यातच राज्यात बुधवारी २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत राज्यभरात ३०९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ९० हजार ८७९ नमुन्यांपैकी १ लाख ७३ हजार ८३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर १६ हजार ७५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ११ हजार ११२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
हेही वाचा - कोरोनामुळे महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती- डाॅ. हर्षवर्धन
राज्यात बुधवारी ३४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृतांची एकूण संख्या ६५१ झाली आहे. बुधवारी झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील २५, पुण्यातील ३, अकोला शहरात ३, जळगाव शहरात १ तर सोलापूर शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे. या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर १३ महिला आहेत. ३४ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १८ रुग्ण आहेत, तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १०४८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून बुधवारी एकूण ११ हजार ६९२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५१.१४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलं आहे.
हेही वाचा - कोरोनाचा हाहाकार ! एका दिवसात आढळले 1233 नवे रुग्ण, 48 तासात 68 जणांचा मृत्यू