मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन (institutional quarantine) वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला (bmc) देण्यात आल्या आहेत. त्यासाठी मुंबईतील ठिकठिकाणच्या शाळा, महाविद्यालये यांचा क्वारंटाईन सेंटर बनवण्यासाठी वापर करण्यात येणार आहे. याठिकाणी कोरोना संशयितांना एकत्रित क्वारंटाईन करता येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली.
फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील स्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, मंबईत संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याचं काम सुरू करण्यात येत आहे. कमी जागेमुळे होम क्वारंटाईन शास्त्रीय पद्धतीने करण्यास अडचणी येत आहे. खासकरून दाटीवाटीच्या वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना अधिक काळ घरात ठेवणं अशक्य होऊन बसतं. अशा वेळी दाट वस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन केलं जाईल. त्यासाठी महाविद्यालय, शाळांमध्ये (school and colleges) खाटा टाकून तशी व्यवस्था केली जाईल.
हेही वाचा - मुंबईतील ७ वॉर्डमध्ये २०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी मंदावला
महाराष्ट्रात दररोज सुमारे ७ हजार कोरोना (corona test) चाचण्या केल्या जातात. बुधवारी ७११२ चाचण्या करण्यात आल्या. कोरोनाचे रुग्ण (covid-19 patient) दुप्पट होण्याचा कालावधी आधी ३.१, त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे. हा ७ दिवसांचा कालावधी अजून वाढविण्याचा उद्देश आहे.
राज्यात दररोज १३ टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत. हे आशादायी चित्र आहे. केवळ एक टक्के रुग्ण अत्यवस्थ आहेत. ८३ टक्के लोकांना लक्षणे नाही, तर १७ टक्के लोकांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. कोरोनामुळे होणारा राज्याचा मृत्यूदर देखील ७ वरून सरासरी ५ वर आला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी २ समित्या नेमल्या आहेत, अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.
आरोग्य यंत्रणांचं अहोरात्र काम
कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केलं जात आहे. जर समजा कुठलीच उपाययोजना केली नाही, तर काय होईल यासाठी गणितीय गृहितकावर आधारित रुग्णसंख्येची माहिती समाजमाध्यमांवर फिरत आहे. मात्र महाराष्ट्रात ज्या पद्धतीने कार्यवाही होत आहे. रुग्ण दुपटीचा दर सात दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. लोकांनी घाबरू नये, असा दिलासाही आरोग्यमंत्र्यांनी दिला.