मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक जणांचं विलगीकरण करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर विलगीकरणासाठी जागेची अडचण येऊ नये म्हणून गृहनिर्माण विभागानं तब्बल १४ हजार घरं उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. गृहनिर्माण विभागाचं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली.
कोरोना रूग्णांसाठी मुंबईत जागेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. रूग्णांची संख्या वाढली तर त्यांना ठेवायचं कुठे हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण विभागाने घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
कोरोना संकटांची व्याप्ती लक्षात घेऊन गृहनिर्माण खात्यातील अधिकाऱ्यांना या संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार आज अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तात्काळ तत्वावर गृहनिर्माण खात्याने 14000 घरांची उपलब्धता सरकारला या आणीबाणीच्या काळात करून दिली आहे. pic.twitter.com/0xxOQX1BZ0
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 6, 2020
आव्हाड म्हणाले, गरज पडली तर आणखी १० हजार घरं उपलब्ध करून शकतो. रूग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठया प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात आली असावी. आज म्हाडा आणि SRA आणि इतर संबंधित सर्व विभागांच्या प्रमुखांची चर्चा करण्यात आली. गृहनिर्माण विभागही कोरोनाविरुद्धच्या लढाईत अग्रेसर आहे. कोकणातही विभागाची १४०० घरं आहेत गरज पडली तर ती घरंही उपलब्ध करून दिली जातील असंही त्यांनी सांगितलं.
यापूर्वी म्हाडा, एसआरएनंही पुढाकार घेतला होता. एसआरएनं विलगीकरणासाठी २ हजार तर म्हाडा प्राधिकरणाने ६२५ घरं उपलब्ध केली आहेत. कोरोनाची व्याप्ती वाढून ऐनवेळी विलगीकरणासाठी जागांची कमतरता पडू नये म्हणून राज्य सरकार आणि पालिका जास्तीत जास्त घरें उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईत आपल्या हाती असलेल्या घरांचा आढावा त्यांनी घेतला आहे. त्यातून एसआरएनं २ हजार, तर म्हाडानं ६२५ घरं पुरविण्याचा निर्णय घेतला होता.
क्वारंटाईनसाठी 'इथं' घरं
या सर्व २,६२५ घरांत पाणी, वीजपुरवठा सुरळीत राहील, हे पाहिले गेले. त्यापैकी बहुतांश घरांची संपूर्ण स्वच्छता झाली असून लवकरच ती जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येतील. ही घरे मुंबईतील विविध भागात आहेत. त्या-त्या इमारतीत उपलब्ध असलेल्या घरांनुसार त्याचे वाटप होईल. त्यात म्हाडाकडून मानखुर्दमध्ये २६५, चारकोपमध्ये १७०, महावीरनगरमध्ये १९० घरे आहेत.
दरम्यान देशात लॉकडाउन असूनही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ६९३ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. काल दिवसभरात ३० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आज आत्तापर्यंत २ मृत्यू नोंदले गेले आहेत. २४ तासांतल्या या ३२ मृत्यूंमुळे भारतात कोरोनाबळींची संख्यासुद्धा १०९ वर पोहोचली आहे.
हेही वाचा