देशात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा झपाट्यानं वाढत आहे. दोन महिने लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. असं असलं तरी कोरोनाच्या रुग्णांच्या आकड्यात वाढ होत आहे. त्यात काही दिवसात मान्सूनचं आगमन होणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (IIT) मुंबईनं कोरोनाचा संसर्ग आणि हवामानातील बदलाचा अभ्यास केला आहे. या अभ्यासामध्ये असं नोंदवलं गेलं आहे की पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगानं होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक रजनीश भारद्वाज आणि अमित अग्रवाल यांनी कोरोनाव्हायरसवर अभ्यास केला. रजनीश भारद्वाज यांना असं आढळले की, कोरड्या वातावरणापेक्षा आर्द्रता क्षेत्रात विषाणूचा अस्तित्व दर ५ पट जास्त आहे. अशा परिस्थितीत लवकरच मुंबईत मान्सून धडकणार आहे, त्यामुळं कोरोनाचा धोका अधिक आहे.
पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक असतं. असं वातावरण कोरोनासाठी पुरक आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्यात कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त वेगानं वाढू शकतं. रजनिश आणि अमित या दोन्ही प्राध्यापकांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या शिंकेतून निघणाऱ्या ड्रॉपलेटचा अभ्यास केला. त्यानंतर या ड्रॉपलेटच्या कोरड्या होण्याच्या गतीची आणि जगातील ६ शहरांमध्ये दररोज होणाऱ्या संसर्गाची तुलना केली.
प्राध्यापक अमित अग्रवाल म्हणाले की, जर आर्द्रतेमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त काळ टिकून राहिला तर मुंबई, केरळ आणि गोवा यासारख्या राज्यांत येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी बिकट होईल.
दरम्यान, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच १४९ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १५६७ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत बुधवारी दिवसभरात ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी मोठी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९७ रुग्ण दगावले आहेत. तर ९ जून रोजी ६१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ८ जून रोजी रोजी एकूण ५३ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, बुधवारी मुंबईत कोरोनाचे १५६७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ५२ हजार ४४५ इतकी झाली आहे.
हेही वाचा