मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात मंगळवारी कोरोनाचे नवीन ८८ रुग्ण आढळले. येथील रुग्णांची एकूण संख्या आता ८८२४ झाली आहे. शहरातील रुग्ण वाढीचा वेग घटल्याचं आता दिसून येत आहे. तर रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर गेला असल्याचं समोर आलं आहे.
मीरा भाईंदर शहरात आतापर्यंत २८७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर मीरा भाईंदर शहरातील रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली होती. मात्र, पालिका आयुक्त डॉ.विजय राठोड यांनी पुन्हा लाॅकडाऊन करून परिस्थिती नियंत्रणात आण्याचा प्रयत्न केला. सध्या शहरात प्रतिबंधित क्षेत्रांना वगळता सम विषम पद्धतीने सकाळी ९ ते ७ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे रोज १०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. याआधी रोज १५० रुग्ण आढळत होते.
मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात मृत्यू दर ३.२९ टक्के झाला आहे. आतापर्यंत २८७ रुग्णाचा बळी गेला आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे. आतापर्यंत तब्बल ८०.६३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.