मुंबईसह राज्यभर बालमृत्यूंचं वाढतं प्रमाण हा एक गंभीर प्रश्न आहे. बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि संबंंधीत यंत्रणांकडून प्रयत्न होत आहेत. पण तरीही मुंबईसह राज्यातील बालमृत्यू रोखण्यात सरकार आणि संबंधीत यंत्रणांना यश येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबईसह राज्यात बालमृत्यूचं प्रमाण वाढलं असून मुंबईत वर्षभरात जन्मानंतर २४ तासांच्या आत ४८३ बालकं दगावल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईसारख्या शहरात बालमृत्यूचं हे वाढतं प्रमाण चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे.
राज्यातील बालमृत्यूसंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना राज्याचे आरोग्य मंत्री डाॅ. दिपक सावंत यांनी राज्यात बालमृत्यूचं प्रमाण वाढल्याची कबुली विधानसभेत दिली आहे. हेल्थ मॅनेजमेंट इन्फाॅर्मेशन सिस्टीम अर्थात एचएमआयएसनं मुंबईसह राज्यातील बालमृत्यूबाबत एक अहवाल आरोग्य विभागाकडं सादर केला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार २०१७-१८ मध्ये बालमृत्यूचं प्रमाण वाढल्याचं समोर आलं असून आरोग्य मंत्र्यांनीच ही माहिती विधानसभेत दिली आहे.
या आकेडवारीनुसार एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ पर्यंत राज्यभरात १३ हजार ५४१ बालकं दगावली आहेत. तर जन्मानंतर २४ तासाच्या आता राज्यभरात एकूण ३ हजार ७७८ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईतील ४८३ बालकांचा समावेश आहे. वजन कमी असणं, अपुरे दिवस, श्वसनाचे विकार, अतिसार अशा विविध कारणांनी नवजात बालकं दगावत असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा -
टीबीच्या रुग्णांना पुस्तकांचा आधार