राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोना विषाणू संसर्गाची बाधा झाल्याने सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र महाराष्ट्रात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याची चिंता त्यांना सतावत आहे, यातूनच त्यांनी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक करतानाच जनतेला सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
राजेश टोपे यांनी जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरूद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे, विशेषत: डाॅक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रीत करू शकलो.
हेही वाचा- बापरे! २ दिवसांत मुंबईतील सील इमारतींची संख्या 'इतकी'
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 22, 2021
मात्र अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामुहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या हाॅस्पिटलमध्ये कोरोनाविरूद्ध लढत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो. कोरोना हाॅटस्पाॅटला भेटी दिल्या, परंतु कोरोनाला माझ्याजवळ येणं जमलं नाही, पण अखेर त्याने मला गाठलंच. मात्र आपल्या सद्भावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा कोरोनाविरूद्धच्या सामुहिक लढाईत सहभागी होणार आहे.
समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लाॅकडाऊनच्या काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र आता पुन्हा लाॅकडाऊन परवडणारं नाही. लाॅकडाऊन टाळणं केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे. तेव्हा मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर तंतोतंत पाळा व लाॅकडाऊन टाळा.
शेवटी स्वत:ची काळजी म्हणजे तुमच्या कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी, प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजे समाजाची काळजी, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.
(maharashtra health minister rajesh tope wrote a letter and appeal to avoid covid 19 and lockdown)