Advertisement

मुंबईत २००० नागरिकांचे बोगस लसीकरण, हायकोर्टात राज्य सरकारची माहिती

भविष्यात असे घोटाळे होऊ नयेत यासाठी योजना आखली जावी याकरिता कोर्टानं सरकारला पाच दिवसांचा अवधी दिला आहे.

मुंबईत २००० नागरिकांचे बोगस लसीकरण, हायकोर्टात राज्य सरकारची माहिती
SHARES

मुंबईत (Mumbai) बनावट लसीकरण (Vaccination Drive) शिबीराच्या माध्यमातीन दोन हजारांपेक्षा अधिक जणांची फसवणूक करण्यात आली आह, अशी माहिती राज्य सरकारनं (State Government) मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) दिली आहे. कोरोनाची (Coronavirus) लस मिळण्यामध्ये लोकांना होणाऱ्या अडचणींसंबंधी दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारनं ही माहिती दिली आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात लोक लसीकरण घोटाळ्याला बळी पडले असल्याची दखल घेत हायकोर्टाने म्हटलं की, “त्या लोकांची नेमकी काय स्थिती आहे याची आम्हाला चिंता आहे. त्यांची तपासणी होणं गरजेचं आहे. बनावट लसीचे काही दुष्परिणाम जाणवत आहेत का? याची माहिती घ्या. त्यांच्या शरिरात अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत का? त्यांना सलाईन किंवा इतर काही दिलं असेल तर काय?”.

२ हजार ०५३ लोकांना बनावट लसीचा फटका बसला असल्याची माहिती कोर्टात देण्यात आली. यामध्ये बोरीवलीमधील ५१४, वर्सोवामधील ३६५, कांदिवलीमधील ३९८, लोअर परळमधील २०७, मालाड पश्चिमेकडील ३० आणि इतर ठिकाणच्या नागरिकांचा समावेश आहे.

कोर्टानं यावेळी सरकारला फटकारत, “तुम्ही इतके प्रयत्न करूनही हे झालं. तुम्ही काय करत होतात?,” अशी विचारणा केली. सरकारनं यावेळी कोर्टाकडे हे प्रकरण हाताळण्यासाठी एक आठवड्यांचा अवधी मागितला आहे. भविष्यात असे घोटाळे होऊ नयेत यासाठी योजना आखली जावी याकरिता कोर्टानं सरकारला पाच दिवसांचा अवधी दिला आहे.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयामार्फत लसीकरण शिबीर आयोजित करू, असे सांगत मुख्य आरोपी राजेश पांडे आणि त्याच्या साथीदारांनी शहरात नऊ ठिकाणी बनावट शिबिरे घेतली. हा प्रकार कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज गृहसंकु लातील रहिवाशांनी उघडकीस आणला.

शिबीर आटोपल्यानंतर रहिवाशांच्या हाती पडलेल्या प्रमाणपत्रांवर अन्य रुग्णालयं, वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या संस्थांची नावे होती. रहिवाशांच्या नावांसह अन्य तपशीलही चुकीचे होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रहिवाशांनी कोकिलाबेन रुग्णालयाकडे चौकशी केली. तेव्हा असे कोणतेही शिबीर घेतलेले नाही, असं रुग्णालयानं स्पष्ट केलं.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे गुन्हा नोंदवून पोलिसांनी आतापर्यंत ६ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडे आणि त्याच्या टोळीनं हिरानंदानी हेरिटेज गृहसंकु लातील रहिवाशांकडून लसीकरणासाठी प्रत्येकी १ हजार २५० रुपये आकारले होते.

कांदिवलीव्यतिरिक्त अंधेरी, वांद्रे इथल्या चित्रपटनिर्मितीशी संबंधित कंपन्यांनी दिलेल्या तक्रारीआधारेही याच टोळीविरोधात वर्सोवा, खार पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला. या दोन कंपन्यांनी पांडेच्या माध्यमातून आपल्या कर्मचारीवर्गासाठी शिबीर आयोजित केले होते.

बोरिवलीतील ‘आदित्य कॉलेज ऑफ डिझाइन स्टडीज’ या महाविद्यालयाच्या विश्वस्त मंडळानंही या टोळीविरोधात पोलीस तक्रार केली. प्रमुख आरोपी पांडे आणि डॉ. त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.



हेही वाचा

रस्त्यावरील बेघर, निराधार व्यक्तींचं नवी मुंबई महापालिकेकडून लसीकरण

ठाणे महापालिकेची लस खरेदीसाठीची जागतिक निविदा अखेर बासनात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा