महाराष्ट्राला सुमारे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे १ कोटी ६ लाख डोस प्राप्त झाले असून त्यापैकी ८८ लाख डोस वापरण्यात आले आहेत. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य सुकाणू समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राला सुमारे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे १ कोटी ६ लाख डोस प्राप्त झाले असून त्यापैकी ८८ लाख डोस वापरण्यात आले आहेत. महाराष्ट्रात डोस वाया जाण्याचे प्रमाण ३ टक्के आहे. ते अत्यंत कमी असून राष्ट्रीय सरासरीच्या देखील निम्मे आहे. ५ एप्रिल २०२१ पर्यंत महाराष्ट्रात ८१ लाख २१ हजार ३३२ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. राज्यात दररोज ४ लाख नागरिकांना लसीकरण केलं जात आहे.
हेही वाचा- तुम्हीच पाठवा विजेचं रिडिंग, ऊर्जामंत्र्यांचं ग्राहकांना आवाहन
औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे या ६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त असून इथं प्राधान्याने ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत. राज्यातील लसीकरणाचा वेग पाहता केंद्र शासनाकडून जास्तीचा लस पुरवठा होण्याकरिता पाठपुरावा करण्यात येईल, असं मुख्य सचिवांनी सांगितलं.
(more than 80 lakh people got covid 19 vaccine in maharashtra)