९ ऑक्टोबरला विक्रम सिंह यांच्या एका नातेवाईकाला ऑपरेशनसाठी ४ युनिट्स रक्ताची गरज होती. तेव्हा त्यांना रक्त उपलब्ध न झाल्यामुळे केईएम रुग्णालयात रक्ताची टंचाई असल्याचं समोर आलं. त्यानंतर पालिकेच्या सर्वच रुग्णालयातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई असल्याची चर्चा सुरू झाली.
१५ मे ते १५ जुलै आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये रक्ताची खरी गरज भासते. कारण या चारही महिन्यांत मोठ्या प्रमाणात सुट्टी असल्याकारणाने रक्तदाते किंवा सामान्य माणसं मुंबईत उपलब्ध होत नाहीत. शिवाय, कॉलेजेसनाही सुट्टी असल्याकारणाने मोठा युवा वर्ग उपलब्ध होत नाही. त्यामुळे रक्तपेढ्यांतर्फे किंवा सामाजिक संस्थांतर्फे या महिन्यात रक्तदान शिबिरे आयोजित केली जात नाहीत. शिबिरे जरी आयोजित केली तरी तेवढ्या प्रमाणात रक्तदान केलं जात नाही.
अनेकदा काही महत्त्वाच्या प्रसंगीच रक्तदान शिबिरे भरवली जातात. पण, तसं न करता रक्तपेढ्यांनी किंवा सामाजिक संस्थांनी वारंवार रक्तदान शिबीरं भरवावीत. म्हणजे या काळात रक्ताची टंचाई होणार नाही, असं आवाहन 'राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात' यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केलं आहे.
एप्रिल, मे किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबर या काळात सुट्ट्या असल्यामुळे रक्तपेढ्यांमार्फत किंवा सामाजिक संस्था, कॉलेजेसकडून रक्तदान शिबीरं भरवली जात नाही. म्हणून रक्तपेढ्यांनी, सामाजिक संस्थांनी कधी आणि किती रक्तदान शिबीरे राबवली पाहिजेत? याचं नियोजन करावं. जेवढी गरज आहे, तेवढ्याच रक्ताचा साठा करावा.
डॉ. अरुण थोरात, सहाय्यक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, मुंबईत २ लाख २൦ हजार एवढं युनिट रक्त दरवर्षाला लागते. मुंबईत एकूण ५९ रक्तपेढ्या आहेत. पण, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाहेरुन येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता २൦१६ या वर्षात ३.൦४ लाख युनिट एवढं रक्त संकलित करण्यात आलं आहे.
मुंबईला दररोज जवळपास ९൦൦ युनिटची रक्ताची गरज भासते. त्यात शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या रक्ताचा देखील समावेश असतो. बुधवारी ५९ रक्तपेढ्यांपैकी ३൦ रक्तपेढ्यांमध्ये २८७६ युनिट रक्ताचा साठा आहे.
रक्तगट | उपलब्धता (युनिट) |
---|---|
ए पॉझिटिव्ह | ५८८ |
ए नेगेटिव्ह | ७३ |
बी पॉझिटिव्ह | ७४९ |
बी नेगेटिव्ह | ७५ |
एबी पॉझिटिव्ह | २४२ |
एबी नेगेटिव्ह | २६ |
ओ पॉझिटिव्ह | १൦२८ |
ओ नेगेटिव्ह | १൦६ |
मुंबईतील ५९ रक्तपेढ्यांमध्ये मागील तीन दिवसांमध्ये सरासरी २५൦൦ ते ३൦൦൦ युनिट एवढा रक्ताचा साठा उपलब्ध होता. पण, याबाबत राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे रक्त उपलब्ध न झाल्याची कुठलीही तक्रार आलेली नाही. त्यामुळे जर विशिष्ट रक्तगटाची एखाद्या रक्तपेढीमध्ये उपलब्धता नसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही स्पष्टीकरण डॉ. थोरात यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिलं आहे.
महापालिकेच्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात देशभरातील रुग्ण येतात. शिवाय, १५ मे ते १५ जुलै आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर हा काळ खूप कठीण असतो. सुट्ट्यांच्या काळात सर्जरी करण्याचंही प्रमाण जास्त असतं. त्यामुळे या काळात कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, बॅंकांनी, राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन शिबीरं भरवली पाहिजेत.
रविंद्र इंगोले, समाजविकास अधिकारी, रक्तपेढी, केईएम रुग्णालय
रुग्ण आणि रक्तपेढीतील कर्मचारी यामध्ये बऱ्याचदा संवादाचा अभाव आढळतो. रक्तपेढीत रक्त उपलब्ध असतानाही कर्मचाऱ्यांमार्फत योग्य ती माहिती दिली जात नाही. नेगेटिव्ह रक्तगटाचं रक्त बऱ्याचदा उपलब्ध नसू शकतं. शिवाय, मोठ्या शस्त्रक्रियांसाठी, थॅलेसेमिया आजारग्रस्त रुग्णांसाठी रक्त आरक्षित ठेवलेलं असतं. यामुळे रक्तपेढीत रक्त असूनही रक्त उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येऊ शकतं.
हेही वाचा