एखादी आपतकालीन परिस्थिती आपल्या कुटुंबियांवर ओढवली आणि रक्त हवं असलं की आपल्याला रक्ताची खरी किंमत कळते. पण, याच रक्ताची खरी किंमत ओळखून, मुंबई पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात असलेले पोलीस नाईक म्हणून कार्यरत असणारे पुंडलिक आव्हाड यांनी आतापर्यंत 50 वेळा रक्तदान केलं आहे. जर कोणाला तत्काळ रक्ताची गरज असेल किंवा कुठेही रक्तदान शिबीर भरवलं असो, आव्हाड रक्तदानासाठी धावून जातात. गेल्या 20 वर्षांत आव्हाड यांनी तब्बल 50 वेळा रक्तदान केलं आहे.
दोन मुली आणि पत्नी असं आव्हाड यांचं कुटुंब. आजारपणामुळे मुलगा गमावला आणि मोठी मुलगी ज्ञानेश्वरी हिला हृदयाचा विकार. या अशा परिस्थितीतही आव्हाड नेहमीच रक्तदानासाठी तत्पर असतात. वर्षातून किमान 2 ते 3 वेळा ते रक्तदान करतात. त्यांच्या या समाजकार्याबद्दल अतिरिक्त पोलीस आयुक्त अतुल पाटील यांनी नुकताच आव्हाड यांचा सत्कार केला.
2002 साली माझ्या मुलीच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. त्यावेळेस रुग्णालयात दक्षिणेकडून आलेल्या एका कुटुंबाला त्यांच्या मुलीसाठी रक्ताची गरज होती. त्यांना ओ पॉझिटिव्ह रक्तगटाचं रक्त हवं होतं. पण, पळापळ करुनही त्यांना रक्त मिळत नव्हतं. त्यावेळी मला कळलं की रक्तदान करणं किती महत्त्वाचं आहे. मी त्यांच्या मुलीलाही रक्त दिलं.
पुंडलिक आव्हाड , पोलीस नाईक, पोलीस मोटार परिवहन, शिवडी
मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात राहणारे आव्हाड यांनी त्यांच्या तालुक्यातही बरीच शिबीरं राबवली आहेत. शिवाय, यापुढेही आपण असंच रक्तदान करणार असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं.
हेही वाचा