कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन केलं जात आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवल्यास कोरोनाला रोखता येईल. मात्र, काही अतिउत्साही लोकांना मात्र याचं अजिबात गांभिर्य दिसत नसल्याचं समोर आलं आहे. मुंबईत कोरोना आजारापासून बरा झालेल्या व्यक्तीची चक्क मिरवणूक काढण्यात आली. हा व्यक्ती घरी आल्यावर स्थानिकांनी त्याची वाजतगाजत मिरवणूक काढत सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी केली. परिस्थितीचं गांभिर्य नसलेल्या या लोकांमुळे मात्र सरकारचे प्रयत्न वाया जाण्याची शक्यता आहे.
मुंबई हे कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. मुंबईत रोज रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहन सरकारपासून सगळेच करत आहेत. कुर्ला पूर्वेला असलेल्या नेहरूनगरमधल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर तो बरा झाला. त्यानंतर तो जेव्हा घरी आला तेव्हा स्थानिक लोकांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं आणि मिरवणूकच काढली. त्या व्यक्तिच्या स्वागतासाठी तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती.
अरुंद गल्ल्या आणि दाटीवाटीत असलेली घरं यामुळे आधीच या भागात कोरोनाचा प्रसार होत आहे. सरकार युद्ध पातळीवर काम करत आहे. त्यामुळे उत्साहाच्या भरात होणारी गर्दीही घातक ठरू शकते. अशा अतिउत्साहामुळे नव्या संकटाला आमंत्रण मिळण्याची भिती आहे.
अर्णब गोस्वामी यांच्यावर हल्ला, काँग्रेसवर केले गंभीर आरोप