स्वाईन फ्लू, मलेरिया, गॅस्ट्रो, व्हायरल फिवरच्या साथीमुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना आता डोकेदुखीच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. फक्त डोकेदुखी आणि अंगदुखीच्या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत.
तशी तर आपल्याला अनेक कारणांमुळे झोप लागत नाही. त्याची कारणं कधी कधी आपल्याला कळतही नाहीत. अपूर्ण झोप आणि पोषक आहाराच्या अभावामुळे शरीरात आवश्यक जीवनसत्त्वांचा तुटवडा निर्माण झाल्यास प्रामुख्याने झोप लागत नाही. खूप जास्त ताण, चहा-कॉफीचं अतिसेवन, तसंच अनेक व्यसनांमुळेही झोप लागत नाही. त्यामुळे अनेकदा डोकं दुखण्याची समस्या उद्भवते.
उच्च रक्तदाब, मधुमेही रुग्णांमध्येही डोकेदुखीच्या तक्रारी असतात. उकाड्यानंतर पाऊस सुरू झाल्यानंतर हवामानात अचानक बदल झाला आहे. पाऊस थांबला की हवेतील आर्द्रताही वाढते आणि हे वातावरण ताप, खोकला असे अनेक संसर्गजन्य आजार पसरवण्यासाठी पोषक ठरते.
वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात डोकेदुखीच्या तक्रारी आमच्याकडे येतात. तसंच सायनस हेही डोकेदुखीच्या तक्रारी वाढण्याचे एक मुख्य कारण आहे. अर्धशीशीसारख्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात असतात. केवळ औषधे आणि काळजी घेऊनच बरं होण्याचा पर्याय रुग्णांकडे आहे.
- डॉ. शशिकांत म्हसाळ, कान-नाक-घसा तज्ज्ञ
साथीच्या आजारांमध्ये ताप आल्यानंतर डोकेदुखी सुरू होते. त्यामुळे घरीच गोळ्या घेणे, गरम वाफ घेण्याचे उपाय केले जातात. या घरगुती उपायांनी दोन दिवसांत सर्दी गेली नाही, तर तातडीने डॉक्टरांकडे जायला हवं. डोकेदुखी थांबवण्यासाठी अॅन्टिबायोटिक्स औषधे सुरू केली, तर त्याचा पूर्ण कोर्स करण्याचाही सल्ला डॉक्टर देतात. हा कोर्स बंद केला तर, त्याचे दुष्परिणाम पुन्हा डोकेदुखीच्याच स्वरुपात सहन करावे लागतात.
तापासारखे वाटत असेल आणि डोकेदुखी असेल, तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जा. घरगुती उपायांवर विसंबून राहू नका, तसेच डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळच्या वेळी घ्या. अन्यथा, पुन्हा डोकेदुखी होण्याची शक्यता कायम राहते.
- डॉ. अविनाश पवार, कान-नाक-घसा तज्ज्ञ
हेही वाचा
उत्तम आरोग्यासाठीचा 'मसाला भांगडा'
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)