मुंबई शहरात करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणात ४१ ते ६० दरम्यान वय असलेल्या रहिवाशांना कोरोना विषाणू संक्रमणाचा मोठा फटका बसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे झोपडपट्टी आणि इतर वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सारख्याच प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई महानगरपालिका, नीती आयोग आणि टाटा इंन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) या तिघांनी मिळून हे सर्वेक्षण केलं आहे. ‘टीआयएफआर’ ने झोपडपट्ट्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणा अंतर्गत ४१ ते ६० वयोगटातील १,०६० जणांपैकी ५०.३ टक्के रहिवाशांमध्ये कोरोनाविरूद्धच्या अँटीबाॅडी तयार झाल्याचं आढळून आलं. तर इतर ठिकाणच्या सर्वेक्षणात ९६४ जणांपैकी १८.६ टक्के रहिवाशांच्या शरीरात अँटीबाॅडीज तयार झाल्या होत्या. या वयोगटातील बहुतांश लोकं हे कामानिमित्त घराबाहेर पडणारी असल्याने त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
हेही वाचा- 'या' भागांमध्ये सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात
याआधी मुंबईत केलेल्या सेरो सर्वेक्षणातील पहिल्या टप्प्यात झोपडपट्टीतील ५७ टक्के रहिवाशांमध्ये कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या अँटीबाॅडीज तयार झाल्याचं आढळून आलं होतं. तर इतर ठिकाणच्या १६ टक्के रहिवाशांमध्ये अँटीबाॅडीज तयार झाल्या होत्या.
सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अँटीबाॅडीज तयार झालेल्या झोपडपट्टी व्यतीरिक्त इतर ठिकाणच्या रहिवाशांची संख्या वाढलेली दिसून आली.
हेही वाचा- माटुंगा, वांद्रे, दहिसरमध्ये पालिका करणार ‘सेरो’ सर्वेक्षण, 'हे' आहे कारण