राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 52 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 78 टक्के लोकांना डायबेटीस, हाय ब्लडप्रेशर यासारखे गंभीर आजार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि ज्यांना डायबेटीस, हाय ब्लडप्रेशर असे आजार आहेत त्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.
कोरोनामुळे मृत्यूमध्ये झालेल्यांमध्ये पुरुषांचं प्रमाण 73 टक्के आहे. तर मृतांमध्ये 60 टक्के लोकांचं वय हे 61 पेक्षा अधिक असल्याचं समोर आलं आहे. मृतांमध्ये 45 वर्षाखालील एकच रुग्ण आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 868 झाली आहे. आतापर्यत 70 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 17,563 नमुन्यांपैकी 15,808 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 868 जण पॉझिटिव्ह आले आहेत. 70 जण बरे झाले आहेत.
निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 8 जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी 2 जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशीम मधील आहे.
हेही वाचा -
हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक, मात्र ग्राहक नाही
कोरोनाग्रस्ताच्या घरातून पोपटाची सुखरूप सुटका