नववीत शिकणारी मिनाक्षी (बदललेलं नाव) गेल्या ६ महिन्यांपासून शाळेतच गेली नाही. तुम्हाला वाटेल मुलांचं काय, हे असतंच...पण, खरंतर जर तुमची मुलं काही कारणास्तव शाळेत जायला नकार देत असतील, तर कदाचित त्यांना शाळेत जाण्याची भिती देखील वाटत असेल. मिनाक्षीची लक्षणं देखील अशीच काहीशी होती. ती शाळेचं नाव देखील काढलं तरी रडायची, टाळाटाळ करायची. आई-वडिलांनी सांगूनही ती शाळेत जायला नकार द्यायची. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिच्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचं ठरवलं.
मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ला आणि उपचारांनंतर कळलं की मिनाक्षीला 'स्कूल फोबिया' नावाचा आजार आहे. जो आपल्याला कधीही होऊ शकतो. कारण, मिनाक्षी आठवीपर्यंत शाळेत जात होती. पण, गेल्या सहा महिन्यांत फक्त परिक्षेसाठीच ती शाळेत गेली आहे.
तिचे आई-वडिल जेव्हा आमच्याकडे तिला घेऊन आले, तेव्हा आम्ही तिच्या तपासण्या केल्या. तिला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्यातून आम्हाला कळलं की तिला शाळेत जाण्याची भिती वाटते. त्यानुसार आम्ही तिच्या शाळेतील शिक्षकांना देखील हे सर्व सांगितलं. त्यांना ही विश्वास बसत नव्हता.
डॉ. सागर कारिया, मानसोपचारतज्ज्ञ, सायन रुग्णालय
शिक्षकांना विश्वासात घेतल्यानंतर मिनाक्षी आता फक्त परिक्षेसाठीच शाळेत जाते. परिक्षेच्या वेळेस तिला एक रुम दिला जातो. ती एकटीच बसून पेपर लिहिते आणि घरी येते, असंही डॉ. कारिया यांनी स्पष्ट केलं आहे.
अशीच एक ७ वी इयत्तेत शिकणारी कामिनी (बदललेलं नाव) हिला 'स्कूल फोबिया' नावाचा आजार आहे. तिच्यावर मानसिक उपचार सुरू आहेत. समुपदेशन आणि गोळ्यांमुळे आता हळूहळू तिच्यात शाळेविषयी गोडी निर्माण होत असल्याचं डॉ. कारिया यांनी सांगितलं.
हेही वाचा