मागील काही दिवसांपासून मुंबईत रक्तदानाचं प्रमाण घटलं आहे. कोरोनाच्या भितीने रक्तदाते पुढे येत नाहीत. त्यामुळे नवीन रक्त जमा होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. परिणामी मुंबईत पुढील काही दिवसांत रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.
मुंबईत सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचं प्रमाण खूपच कमी आहे. काही रक्तपेढ्यांमध्ये केवळ आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या शक्यतेमुळं रक्तदान शिबिरं आयोजित करण्याला मर्यादा आहेत. त्यामुळं गृहनिर्माण सोसायट्यांनी छोटे कॅम्प घ्यावेत, यासाठी सरकार व सामाजिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनानंतर मार्चच्या शेवटच्या व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं झाली. त्यामुळं एप्रिल महिन्यात रक्ताचा तुटवडा भासला नाही. मात्र, कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यानं नियमित रक्तदान करणारे लोकही पुढे यायला घाबरत आहेत.
मे आणि जून महिन्यांत सुट्ट्यांमुळं दरवर्षी रक्ताचा तुटवडा भासतो. अशा वेळी आम्ही बऱ्याचदा रुग्णालय कर्मचारी व पोलिसांची मदत घेतो. मात्र, सध्या यातील बरेच लोक कोरोनाच्या लढाईत गुंतले आहेत. शिवाय, त्यांनाही स्वत:च्या आरोग्याची भीती आहे. थॅलेसेमियावर उपचार देणाऱ्या रुग्णालयांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे, असं सरकारी रक्तपेढीतील एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
हेही वाचा -